आंबेगाव तालुक्यात डोंगराला आग लावण्याच्या घटनांमध्ये वाढ
आग लावणाऱ्या समाज शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी
गेल्या काही दिवसात आंबेगाव तालुक्यातील विविध गावातील डोंगरावर वनवा लागण्याच्या घटना घडल्या असून या वनव्यात शेकडो झाडे जळून खाक होत आहेत. शेकडो पक्षी सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडत आहेत तरी वनविभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन डोंगराला लागणारे वनवे रोखावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी कडून होत आहे
आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळील लांडेवाडी, निघोटवाडी येथील डोंगराला दिनांक १४, १५ रोजी दुपारच्या सुमारास वनवा लागल्याची घटना घडली होती तर दिनांक १६ रोजी मेंगडेवाडी पहाडदरा रस्त्यावरील डोंगराला देखील वनवा लागल्याची घटना घडली होती. या आगीत डोंगरावरील शेकडो एकर जागेतील झाडे, झुडपे जळून खाक झाली असून छोटे प्राणी, पक्षी देखील मृत्यु पावले आहेत.
ऐन कडक उन्हाळ्यात डोंगराला आग लागल्याने आग चागलेच रौद्ररूप धारण करत असते त्यामुळे ही आग विझवताना वनविभागाचे कर्मचारी, रेस्कु टीम, स्थानिक ग्रामस्थ यांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान लांडेवाडी निघोटवाडी मेंगडेवाडी येथे आग लागल्याची घटना कळताच वनविभागाचे कर्मचारी, रेसकु टीम सदस्य स्थानीक ग्रामस्थ यांनी मोठे प्रयत्न करुन आग विझवली आहे.
माञ आगीत शेकडो वृक्ष जळून गेल्याने निसर्गप्रेमी प्राणी मित्र यांनी हळहळ व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसात आंबेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी डोंगराला वनवा लागल्याच्या घटना घडल्या असून वनवा लागल्याचे कारण अस्पष्ट आहे. कोणी तरी अज्ञात व्यक्ती जाणीवपूर्वक वनवा लावत असल्याचे सांगितले जात असून आग लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन वनविभागाने त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.