राज्यात प्रथमच विमान प्रवासासह शेतकरी अभ्यास दौऱ्याची यशस्वी सांगता
— पालकमंत्री अबीटकर यांच्या संकल्पनेतून झाला अभ्यास दौरा
– फळबाग लागवड, सेंद्रीय शेतीतील नाविण्यपूर्ण संशोधनाचा उपयोग करण्याचा सहभागींचा निर्धार
– आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौऱ्यातील 55 शेतकऱ्यांचे विमानतळावर कोल्हापुरी पद्धतीने स्वागत
कोल्हापूर/प्रतिनिधी
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राज्यात प्रथमच विमान प्रवासासह शेतकरी अभ्यास दौऱ्याची यशस्वी सांगता झाली. राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौऱ्यांतर्गत जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील विजेत्या तसेच प्रयोगशील 55 शेतकऱ्यांनी विमान प्रवास करीत कृषि विषयक माहिती जाणून घेतली. या मिळालेल्या संधीतून सहभागी शेतकरी आनंदाने भारावून गेल्याचे चित्र विमानतळावर दिसून आले. त्यांचे स्वागत सहयोगी अधिष्ठाता राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर अशोक पिसाळ यांनी केले.
यावेळी विभागीय कृषी सेवा संचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर जालिंदर पांगरे, विशेष कार्यकारी अधिकारी (पालकमंत्री कार्यालय) शरद मगर, संदेश भोईटे, प्रकल्प संचालक आत्मा रक्षा शिंदे, कृषी उपसंचालक नामदेव परीट, उपविभागीय कृषी अधिकारी करवीर अरुण भिंगारदेवे, उप कृषी अधिकारी करवीर संतोष पाटील उपस्थित होते.
फळबाग लागवड, सेंद्रीय शेतीतील नाविण्यपूर्ण संशोधनाचा उपयोग करण्याचा निर्धार आंतरराज्य अभ्यास दौऱ्यातील सहभागी शेतकऱ्यांनी केला असल्याची माहिती त्यांनी कोल्हापूर येथे परतल्यानंतर दिली. कोल्हापूर विमानतळावर अभ्यास दौऱ्यातून परत आल्यानंतर कृषी विभागासह प्रशासनाने कोल्हापुरी पद्धतीने फेटे बांधून त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी दौऱ्यातील विविध भेंटींमधील अनुभव सांगितले.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कोल्हापूर यांच्या वतीने राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौऱ्यांतर्गत जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील विजेत्या तसेच प्रयोगशील 55 शेतकऱ्यांचा दि. 9 ते 13 ऑगस्ट 2025 या 5 दिवसांच्या बेंगलोर, म्हैसूर येथील विविध शासकीय संशोधन केंद्रांमध्ये यशस्वी अभ्यास दौऱ्याची सांगता झाली. या दौऱ्यामुळे परराज्यातील शेती क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, इंडियन इन्स्टिट्युट फॉर हॉर्टिकल्चर रिसर्च (आय.आय.एच.आर.) बेंगलोर व सेंद्रीय शेती संशोधन संस्था, म्हैसूर येथील संशोधनाचा उपयोग जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला होणार आहे.
शेतकऱ्यांना प्रथमच या दौऱ्यात विमान प्रवासाचा अनुभव मिळाला. यामुळे सर्वांनी पालकमंत्री आबिटकर यांचे आभार मानले. उपस्थित सर्व शेतकरी या दौऱ्यातून भारावून गेल्याचे दिसून आले. मिळालेल्या संधीचा नक्कीच शेतीमध्ये उपयोग होणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. उत्पादकता वाढ, नवनवीन संशोधन, काढणी पच्छात संशोधन, बाजार मुल्य वाढीसाठी प्रक्रिया, खतांचा उपयोग यासह प्रयोगशील वृत्तीमधून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.