शहरात ५ टन टाकाऊ वस्तूंचे संकलन
– नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर/ प्रतिनिधी
महापालिकेच्यावतीने गुरुवारी शहरभरातून ५ टन वापरात नसलेल्या वस्तूंचे संकलन करण्यात आले. या विशेष उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहा.आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत शहरातील घराघरातून जुने कपडे, उशा-गाद्या, खराब इलेक्ट्रीक वस्तू, बॅग, पर्स, ट्यूबलाईट, बल्ब, कालबाह्य औषधे, शुज, काच, लाकडी फर्निचर, टी.व्ही, टप, चटई, सोफा सेट, तेलाचे डबे व इतर वस्तू संकलित करण्यात आल्या. महापालिकेच्या घंटागाड्या व टिप्परद्वारे संपूर्ण शहरातून हे संकलन करण्यात आले. शहरातील नागरिकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात चमड्याच्या वस्तू, बॅगा, सुटकेस इत्यादी टाकाऊ वस्तू महापालिकेच्या घंटागाडी कडे जमा केल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने हि मोहीम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा टाकाऊ वस्तू उघड्यावर किंवा रस्त्यावर न टाकता थेट आपल्या प्रभागात येणाऱ्या घंटागाडीकडे सुपूर्द कराव्यात. तसेच या व्यतिरिक्त सोमवार ते शनिवार, सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत देखील आपल्या संबंधित वॉर्डातील स्वच्छता कार्यालयात या वस्तू स्वखर्चाने जमा करण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. या सुवधिेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले आहे.
———————-